प्रा. ना. स. फरांदे यांचे निधन

विधानपरिषदेचे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. ना. स. फरांदे (वय ७८) यांचे मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झाले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. फरांदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील ओझरडे येथील होते. त्यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी धुळे येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. धुळ्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून सेवा केली. याच काळात ते सक्रिय राजकारणात आले. ते भाजपचे नगरचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही धुरा सांभाळली.
‘फरांदे सर सोडून गेले आहेत. आणीबाणीतही सक्रीय असलेले सर अत्यंत लोकप्रिय नेते होते. बरेच काम केल्यानंतर त्यांना विधानपरिषदेची संधी मिळाली. सभापती म्हणून त्यांनी विधानपरिषदेची उंची वाढविली,’ अशा शब्दांत पालकमंत्री बापट यांनी प्रा. ना. स. फरांदे यांना श्रद्धांजली वाहिली. प्रा. फरांदे यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
‘प्रा. फरांदे यांनी प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या केलेल्या बांधणीमुळे राज्यात सत्ता आली होती. फरांदे यांच्या निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे,’ अशा भावना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी व्यक्त केल्या.
प्रा. फरांदे यांच्या मेंदूत आठ दिवसांपूर्वी रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर घोलेरोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रा. फरांदे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार अनिल शिरोळे, आमदार देवयानी फरांदे, स्नेहलता कोल्हे, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष योगेश गोगावले आजी व माजी आमदार, नगरसेवक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातूनही पक्षाचे पदाधिकारी, आमदार; तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी पुण्यात आले होते.

प्रा. रा. फरांदे नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती अशा दोन्ही पदांवर त्यांनी काम केले. त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश आले होते.
‘प्रा. फरांदे यांची कोपरगाव ही कर्मभूमी होती. त्यांच्या रूपाने एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले,’ अशी भावना माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी व्यक्त केली. माळी समाजाच्या वतीने रवी चौधरी यांनी श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *