१८ नोव्हेंबरला आझाद नगरमध्ये राहणारे शर्मा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. ब्रह्मांड परिसरातील रस्त्यावर त्यांना भरधाव कारने उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवला होता. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, सफेद रंगाच्या कारने शर्मांना धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केल्यानंतर आरोपी कारचालक त्यांची आधीपासूनच तिथे वाट पाहत उभा होता, असे दिसून आले. शर्मा आल्यानंतर चालकाने भरधाव कारखाली त्यांना चिरडले आणि तेथून पसार झाला. ही हिट अॅण्ड रनची घटना नसून हत्या असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी शर्मांच्या मुलाकडे चौकशी केली असता, जवळच राहणाऱ्या सुमरी यादव या महिलेशी त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्या महिलेचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात तिने एका व्यक्तीला वारंवार फोन केल्याचे निदर्शनास आले. पण घटनेनंतर त्यांच्यात पुन्हा फोनवरून बोलणे झाले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सुमरी यादव संपर्कात असलेल्या व्यक्तीचे नाव जयप्रकाश चौहान असल्याचे समजले. त्यात जयप्रकाश कारचालक असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने कारमालकाचा शोध घेतला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. घटनेच्या दिवशी सफेद रंगाची कार जयप्रकाश चालवत होता, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानुसार, पोलिसांनी जयप्रकाशला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, सुमरी यादव हिने शर्मांची हत्या करण्यात सांगितले होते, अशी कबुली त्याने दिली. शर्मा हे त्रास देत असल्याचे सुमरीने सांगितले. त्यानंतर दोघांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.
