दुपारी समुद्रात भरती, सावधानतेचा इशारा

ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली असून पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५ ते १० मिनिटे उशिराने सुरु आहे. दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे आज (मंगळवारी) मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

दक्षिण भारताला झोडपणारे ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओखी चक्रीवादळ सध्या ताशी १८ किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत आहे. मुंबईपासून ४२० किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे. मंगळवारी मध्यरात्रीपर्यत ते सुरतजवळ स्थिरावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली असली, तरी महाविद्यालयांत होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजीत वेळेनुसारच होणार असल्याचे रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाकडून कळवण्यात आले. अभियांत्रिकी, विधी आणिअन्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

‘ओखी’ चक्रीवादळामुळे ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *