महाराष्ट्रातील शेतकरी हैराण झाला आहे. गेल्या वर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसेही अद्याप मिळालेले नाहीत.
राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि केंद्रातील आणि राज्यातील भाजपाचे सरकार निगरगट्टपणे झोपेचे सोंग घेऊन बसले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
सरकारला जाग आणण्यासाठी नांदेड येथे निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व अशोक चव्हाण यांनी केले. ते म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक भागात पेरण्या झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात दुष्काळात होरपळत आहे आणि मंत्री रोज नवा घोटाळा करण्यात गुंतले आहेत, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

