अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी 2 जुलै रोजी झालेल्या अपघाताचं खापर चिमुकलीच्या पित्यावरच फोडलं आहे. अपघातातील मृत मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते, तर तिचे प्राण वाचले असते, असं ट्वीट हेमा मालिनी यांनी केलं आहे.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात 2 जुलै रोजी हेमा मालिनी यांच्या मर्सिडिज कारचा अपघात झाला होता. समोरुन येणाऱ्या ऑल्टो कारची आणि हेमा मालिनी यांच्या कारची समोरसमोर धडक झाली होती. यामध्ये ऑल्टो कारमधील चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले होते. शिवाय हेमा मालिनीदेखील जखमी झाल्या होत्या.
अपघातानंतर इतर जखमींना तिथेच सोडून हेमा मालिनी एकट्याच जयपूरच्या रुग्णालयात दाखल झाल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. हेमा यांना 4 जुलै रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि चार्टर्ड विमानातून मुंबईला आल्या.
यानंतर हेमा मालिनी यांनी ट्विटरवर ट्वीटची मालिकाच सुरु केली. या ट्वीट्समध्ये त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आणि मीडिया तसंच इतर काही लोकांवर प्रतिमा मलिन केल्याने जोरदार टीका केली.

