‘हे’ गावही ‘माळीण’च्या वाटेवर ?

‘हे’ गावही ‘माळीण’च्या वाटेवर ?

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात तारळी खोर्‍यातल्या डोंगराच्या कुशीत घाटेवाडी हे गाव वसलेलं आहे. जूनमध्ये झालेल्या पावसानं इथली जमीन 9 फुटांनी खचली आहे. जमीन खचल्यामुळे पूर्ण डोंगर कोसळून ‘माळीण’ची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे.

या गावात 136 कुटुंबं आहेत आणि गावची लोकसंख्या आहे 1200. मात्र, या गावाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. उलट यावरून आजी-माजी आमदारांनी राजकारण सुरू केलंय. इतकंच नाही तर घाटेवाडीच्या पुनर्वसनाच्या 6 कोटींचा निधीदेखील ठेकेदारानं लाटल्याचा आरोप होत आहे. या गावाला सर्वात मोठा धोका पावसाचा आणि जमीन खचण्याचा आहे, असा अहवाल जिल्हा प्रशासानं 10 वर्षांपूर्वी दिला होता.

त्यानंतर घाटेवाडीचं पुनर्वसन करण्यासाठी 2004 मध्ये 98 घरांचं काम सुरू झालं. 6 कोटी 12 लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र अजूनही फक्त 40 टक्के काम पूर्ण झालंय आणि तेही निकृष्ट असल्याचं प्रमाणपत्र जिल्हाधिकार्‍यांनी दिलंय. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पुनर्वसन प्रकल्प मंजूर केला तर 2004मध्ये शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी भूमीपूजन केलं. त्यानंतर दोघांनीही कामाकडे दुर्लक्ष केलं. त्या दोघांच्या राजकारणात गावकरी मात्र भरडले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *