ठाण्याच्या वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि कोपरी भागात सध्या माकडांनी धुमाकूळ घातला आहे. या माकडांना हुसकावण्यासाठी स्थानिकांनी नाना तऱ्हेच्या क्लुप्त्या करुन पाहिल्या, मात्र मर्कटलीलांपुढे त्या साफ फोल ठरत आहेत. त्यामुळे आता वनविभागानेच या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसात या माकडांनी अनेकांच्या घरात शिरत खाद्यपदार्थांवर तावही मारला आहे. शिवाय अनेक वस्तूंचं नुकसानही माकडांनी केलं आहे. शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने माकडांनी थेट आता माणसांच्या घरातच प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान माकडांच्या भीतीने लहान मुलं आणि महिला घराच्या बाहेर पडण्यासही धजावत नाहीत. वर्तकनगर भागात तर चक्क माकडं झोपाळ्यावर बसून झोके घेताना दिसतात. नागरिकांनी अनेकदा वनविभागाकडे दाद मागूनही वनाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

