कवठेमहांकाळमधील जवान रामचंद्र माने जम्मू काश्मीरच्या मच्छिल भागात झालेल्या हिमस्खलनात शहीद झाले. शहीद रामचंद्र माने यांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात आले असून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. रामचंद्र माने यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
आज सकाळी माने यांचे पार्थिव हेलिकॉप्टरद्वारे त्यांच्या मूळगावी दाखल झाले. रामचंद्र माने हे कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपूरवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या निधनामुळे रामपूरवाडीवर शोककळा पसरली आहे.
रामचंद्र माने हे गस्त घालत असताना हिमस्खलनची दुर्घटना घडली आणि त्यामध्ये ते गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ते बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता माने, मुलगा संकेत माने (वय 9 वर्षे) आणि रोहन माने (वय 6 वर्षे), असा परिवार आहे. हिमस्खलन झाल्यानंतर 5 जवान यामध्ये गाडले गेले.
ज्यात महाराष्ट्राच्या तीन जवानांचा समावेश होता. मच्छिल भागातील हवामान आणि योग्य ती वैद्यकीय मदत मिळू न शकल्यामुळे पाचही जणांचा मृत्यू झाला.

