मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदवण्यात येत असून, कमाल तापमानाने ३५ अंशांवर मजल मारली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही वाढ नोंदवण्यात येत असून, थंडीत २४ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३५ अंशांवर येऊन ठेपले आहे. कमाल तापमानाच्या वाढीसह सूर्याची प्रखर किरणेही मुंबईकरांना चांगलीच ‘ताप’दायक ठरत असल्याने थंडीने गारठलेले मुंबईकर आता उन्हाच्या तडाख्याने हैराण होत आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)
तापमान ७ अंशांनी वाढले
मुंबईत मात्र किमान अणि कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. १६ अंशांवर घसरलेले किमान तापमान २१ अंशांवर येऊन ठेपले आहे. २४ ते २८ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३५ अंशांवर येऊन ठेपले आहे. वाढत्या तापमानासह प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले असून, आठवड्याभरापासून यात वाढ झाली आहे. बुधवारी कमाल तापमान
३४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
