‘बँकांना जनतेचा विश्वास पुन्हा कमवायला खूप मोठा कालावधी जावा लागेल’

५०० आणि १००० रूपयांच्या उच्च मुल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा अनर्थ ओढावून घेणार आहे. या निर्णयानंतर देशातील जनतेचा बँकिंग व्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेवरील विश्वास पूर्णपणे उडाल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. सध्या कोट्यावधी रूपयांच्या नव्या नोटा छापल्या जात आहेत. मात्र, हा पैसा मागच्या दाराने बाहेर जात असून सामान्य लोकांना बँक खात्यांमधील त्यांच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीत. लोकांचा देशातील बँकिंग व्यवस्थेवर विश्वास होता. २००८-०९ मधील आर्थिक अरिष्टावेळी भारतीय बँकांनी त्याचा परिस्थितीनुरूप लवचिकपणा व विश्वासर्हता सिद्ध केली होती. सामान्य लोकांच्या मनात रिझर्व्ह बँकेची प्रतिमा खूप सक्षम होती. मात्र, आज लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून रिझर्व्ह बँकेविषयीच्या विश्वासालाही तडा गेला आहे, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितले.
असे का झाले? याचे कारण म्हणजे, लोकांनी पै पै करून खूप कष्टाने बँकेत पैसा साठवला होता. पैसे बँकेत ठेवले म्हणजे ते सुरक्षित आहेत, अशी लोकांची खात्री होती. जेव्हा गरज लागेल तेव्हा ते पैसे काढता येतील, असे लोकांना वाटायचे. मात्र, आता बँका पैसे द्यायला नकार देत आहेत. बँकांमध्ये पैसाच उपलब्ध नाही आणि जो पैसा आहे तो बँकेच्या कॅश काऊंटरपर्यंत पोहचतच नाही. एटीएम केंद्रावरही पैशाचा खडखडाट आहे. मात्र, मागच्या दाराने कोट्यावधी रूपयांच्या नव्या नोटा बाहेर पडत आहे. त्यामुळे लोकांनी बँकिंग व्यवस्थेवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा सवाल आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. आता पुन्हा हा विश्वास कमवायला मोठा कालावधी जावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. तुमचा स्वत:चा पैसा हिसकावला जात आहे, यामध्ये नैतिक व योग्य काय आहे? आपले पैसे सुरक्षित आहेत, चिंता करायचे कारण नाही, असे तुम्ही म्हणाल. मात्र, तो पैसा सरकारकडे सुरक्षित आहे. मी तो हवा तसा वापरेन आणि तुम्हाला परत देणार नाही. त्यामुळेच विश्वासाला तडा गेला आहे, असे शर्मा यांनी म्हटले. या सगळ्या गोंधळाला आणि १११ लोकांच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप जबाबदार आहे, असा आरोपही शर्मा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *