ट्रॅकवरील पाणी ओसरेपर्यंत लोकल ठप्पच राहणार

ट्रॅकवरील पाणी ओसरेपर्यंत लोकल ठप्पच राहणार

मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असून मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान रुळांवर साचलेल्या पाण्याचा पू्र्णपणे निचरा होईपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत होऊ शकणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.

मुंबई शहर, उपगनर आणि ठाणे-कल्याण पट्ट्यात गेल्या १२ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पहाटेपासूनच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा ठप्प झाली आहे. लोकल बंद असल्याने आज सकाळीच कामानिमित्त बाहेर पडलेल्या हजारो चाकरमान्यांना रेल्वे स्थानकांवरून माघारी परतावे लागले. कर्जत-कसाऱ्याहून मुंबईच्या दिशने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला ठाण्यातच ब्रेक लागला. ठाण्यातून अनेक प्रवासी परतीचा प्रवास करताना दिसत होते. सकाळपासून ठाण्यातून मुंबईच्या दिशेने एकही लोकल धावलेली नाही. एकीकडे लोकल ठप्प असताना लांब पल्ल्याच्या गाड्याही अडकून पडल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या १६ गाड्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर गेल्या पाच ते सहा तासांपासून अडकलेल्या आहेत.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी रेल्वेसेवेचे ताजे अपडेट्स देताना पाऊस थांबेपर्यंत लोकलसेवा पूर्ववत होण्याची शक्यता नाही, असे संकेत दिले आहेत. ठाणे ते छत्रपची शिवाजी टर्मिनसदरम्यान रुळांवर अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. सायन, कुर्ला, मशीद बंदर या भागात रुळ पूर्ण पाण्याखाली आहेत. त्याचवेळी पाऊसही थांबलेला नाही. त्यामुळे अडचणींमध्ये भर पडली आहे. पाणी बाहेर काढण्याचे काम पंपांच्या माध्यमातून सुरू आहे. पाऊस थांबल्यास रुळ मोकळे करता येतील, असे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, ठाणे ते कसारा-कर्जत या मार्गावर लोकलसेवा सुरू असली तरी किमान तासभर गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *