कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचं महापौरपद आणि नगरसेवकपद राज्य सरकारकडून रद्द करण्यात आलं आहे. याबाबतचं पत्र राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे.
तृप्ती माळवी यांना त्यांच्या कार्यालयातच स्वीय साहाय्यकासह 16 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही तृप्ती माळवींना राजीनामा मागितला होता. मात्र, राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या तृप्ती माळवींना राज्य सरकारनं अखेर झटका दिला आहे.
शिवाजी पेठेतील संतोष पाटील यांच्या घरासमोरची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. ती जमीन परत मिळवण्यासाठी पाटील यांचे महापालिकेत खेटे सुरू होते.
ही जमीन पाटील यांना परत करण्याचा ठराव महापालिकेच्या स्थायी सभेत झाला. मात्र या ठरावावर महापौरांची अंतिम स्वाक्षरी आवश्यक होती.
या अंतिम स्वाक्षरीसाठी महापौर तृप्ती माळवी यांनी त्यांचे पीए अश्विन गडकरी यांच्यामार्फत संतोष पाटील यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली.

