पाक दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबरला उरी येथे भारतीय लष्काराच्या तळावर केलेल्या हल्यामध्ये १९ जवान शहीद झाले होते. या हल्यानंतर संपूर्ण भारतातून पाकिस्तानविरुध्द संताप व्यक्त करण्यात आला. या हल्याचा बदला घेण्यासाठी २८ सप्टेंबच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून ३८ दहशतवाद्यांसह २ पाक सैनिक ठार केले होते. या कारवाईनंतर दोन्ही देशातील तणाव कमालीचे ताणले गेले आहेत. या कारवाईचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. याविषयी प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू म्हणाले की, ‘सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही’.
पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आपल्याच देशातील नेते प्रश्न विचारत आहेत. सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहेत. यावर बोलताना नायडू म्हणाले की, ‘काही लोक कधीच समाधानी नसतात. काही लोक विरोधात असतात, तर काही लोक असे असतात जी प्रत्येक गोष्टीत शंका उपस्थित करतात. DGMO यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राइकची माहिती दिली आहे. यापेक्षा अधिक काही सांगणे हे देश हिताचे नाही आणि यावर चर्चा करणे म्हणजे लष्कराचा अपमान करण्या सारखे आहे. ’
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने म्हटले आहे की अशा प्रकारचा कोणताही हल्ला झाला नाही. त्यानंतर भारतातही काही राजकीय नेते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांच्या या प्रश्नावर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले असल्याचेही सांगण्यात आले आहे.