मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाचा जोर वाढताच मुंबईत डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांचा प्रसार वाढू लागला असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या पालिकेच्या लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयातील साथीच्या आजारांच्या रुग्णकक्षात मर्यादेपेक्षा अतिरिक्त रुग्ण दाखल करण्यात आले असून, अनेक रुग्णांना चटईवर झोपवून उपचार करण्यात येत आहेत. जागा नसल्यामुळे एका खाटेवर दोन रुग्णांना झोपविण्यात येत आहे. अन्य पालिका रुग्णालयांतही अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांसाठी विशेष सोय केल्याचे सांगण्यात येते, मात्र तरीही वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही व्यवस्था अपुरी पडते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पालिका आणि खासगी रुग्णालयातील रुग्णकक्ष तुडुंब भरले असून नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. शीव रुग्णालयात ५, ६, ७, ७अ आणि महिलांसाठी १९, २० रुग्णकक्षात साथीच्या आजारांचे रुग्ण दाखल आहेत. यातील ४० ते ५० रुग्णांची मर्यादा असलेल्या कक्षात शंभरहून अधिक रुग्ण दाखल आहेत. केईएम रुग्णालयातही काही दिवसांपूर्वी एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले होते. शीव रुग्णालयाच्या निवासी स्थानावर राहणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना डेंग्यूची बाधा झाली आहे.
शीव रुग्णालयाच्या ५ क्रमांकाच्या रुग्णकक्षात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकाच कुटुंबातील अनेकांना क्रमाक्रमाने डेंग्यू, मलेरियाची लागण होत आहे. त्यामुळे एक ररुग्ण बरा होतो न होतो तोच दुसरा नातेवाईक रुग्णालयात दाखल होत आहे. सप्टेंबर महिन्यात पालिकेच्या रुग्णालयात २ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून खासगी रुग्णालयांची डेंग्यूमुळे मृत्यू झालेली संख्या अधिक असण्याची भीती आहे. सप्टेंबरच्या २६ तारखेपर्यंत पालिकेच्या रुग्णालयात ३२८७ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. एजिस इजिप्ती या डासांमुळे डेंग्यूचा फैलाव वाढत असून डासांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.