मुंबई आणि पुण्यात राबविण्यात आलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळालेले नाहीत, अथवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेलेच नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठीच्या एका विशेष प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी ३० ते २ जुलैदरम्यान अर्ज सादर करता येणार आहेत. मात्र कोणत्याही स्थितीत अकरावीचे प्रवेश हे ऑफलाईन पद्धतीने होणार नाहीत, यासाठी दखल पालकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे.
शिक्षण उपसंचालक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांपैकी केवळ दोन विद्यार्थ्यांचाही चौथ्या फेरीनंतर प्रवेश निश्चित होऊ शकला नाही. तर १ लाख १२ हजार १६१ विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित झाले होते. आतापर्यंत १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात प्रवेश घेतले असून सुमारे ७० हजारांच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित होऊनही त्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. यामुळे यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रवेश फेरीच्या प्रवेशासाठी ३० जुलैपासून अर्ज सादर करता येणार असून त्याची गुणवत्ता यादी ही ४ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. त्यानंतर ५ ते ६ ऑगस्टदम्यान प्रवेश घेणे बंधनकारक असेल.
चुकीचे अर्ज भरणा-यांसाठीही नवीन संधी
अकरावीच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे, अथवा विषय चुकीचा निवडला आहे, वा एखाद्या विद्यार्थ्यांना शाखा बदली करायची असल्यास त्यांनाही अडचणी होऊ नयेत याची शिक्षण उपसंचालक कार्यालयाने खास दखल घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज करताना प्राधान्यक्रम चुकला आहे, जे विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण आणि एटीकेटीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ९ ते १३ ऑगस्टदरम्यान पहिली विशेष फेरी, १८ ते २३ ऑगस्टदरम्यान दुसरी विशेष फेरी आणि तिसरी व अंतिम विशेष फेरी ही २५ ते ३० ऑगस्टदरम्यान घेतली जाणार असल्याची माहितीही उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.