भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अँटिगा कसोटीत दमदार शतक ठोकून कर्णधारी खेळी साकारली. विराटने कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात जम बसवून नाबाद १४३ धावांची खेळी साकारली. कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसाअखेर भारताला ४ बाद ३०२ धावा करता आल्या आहेत.
प्रचंड फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने अँटिगा कसोटीतील शतकासह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोहलीने गुरूवारी आपल्या कारकिर्दीतील १२ वे शतक पूर्ण केले. याशिवाय, कोहलीने यावेळी जलदगतीने धावा जमवत कसोटी कारकिर्दीतील तीन हजार धावांचा टप्पा गाठला. तीन हजार धावांचा टप्पा गाठणारा कोहली १९ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, एक कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजच्या भूमीवर शतक ठोकणारा कोहली तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी माजी क्रिकेटपटू कपिल देव कर्णधार असताना १९८२ साली त्यांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये नाबाद १००, तर राहुल द्रविडने २००६ साली १४६ धावांची कर्णधारी खेळी साकारली होती. वेस्ट इंडिजच्या धरतीवर पहिल्याच डावात अर्धशतकाहून अधिक धावसंख्या करणारा कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. परदेशात सर्वात जास्त शतकी खेळी साकारणाऱया भारतीय खेळाडूंमध्येही विराटने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी साधली आहे. तसेच संघाचा कर्णधार म्हणून परदेशात खेळताना सरासरीच्या बाबतीत क्रिकेटवीर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर आता कोहलीचाच नंबर लागतो.