कल्याण डोंबिवली शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची पावसामुळे अक्षरश चाळण झाली असून जागोजागी खड्डे पडल्याने आधीच बिकट अवस्था असलेल्या येथील वाहतुकीची दैना उडाली आहे. महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या रस्ते दुरुस्ती कामाचे पितळही उघडे पडले आहे. पावसाळ्यापूर्वी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे भरले जातील, असा दावा अभियांत्रिकी विभागामार्फत केला होता. मात्र, वरवर मलमपट्टी केलेल्या कामांमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने स्मार्ट सिटी परिषद भरवून शहर नियोजनाचे मोठे आराखडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर केले. तसेच यंदाच्या पावसाळ्यात शहरातील अंतर्गत तसेच बाह्य़ रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली जात असल्याचा दावाही अभियांत्रिकी विभागामार्फत केला जात होता. असे असताना गेल्या काही आठवडय़ांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडल्याने येथील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरातील कोळसेवाडी, काटेमानिवली, चिंचपाडा, तिसगाव, संतोषी माता रस्ता, आधारवाडी, लालचौकी रस्ता, मंजुनाथ शाळा रस्ता, महात्मा फुले रस्ता, पंडित दीनदयाळ रस्ता, सुभाष रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समावेश केलेल्या २७ गावांमधील रस्त्यांची अवस्था एखाद्या दुर्गम भागाप्रमाणे भासत आहे. कॉँक्रीटच्या रस्त्यांची कामे मंदगतीने सुरू असल्याने वाहतुकीचे आधीच तीनतेरा वाजले असताना खड्डय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने कल्याण डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत.
सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद–
दरम्यान, शहरात पडलेल्या खड्डय़ांचे तीव्र पडसाद नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. महापालिका हद्दीतील खड्डे भरण्यासाठी ‘जयहिंद’ कंपनीच्या ठेकेदाराला कामे देण्यात आली आहेत. मात्र, ठेकेदाराकडून प्रभावी पद्धतीने काम होत नाही, अशी टीका नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी केली. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ठेकेदाराची काम करण्याची क्षमता नसताना दोन ते तीन ठिकाणची कामे देण्यात आल्याचा आरोप करत प्रशासनाला कोंडीत पकडले. या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे, असे यावेळी महापौरांनी सूचित केले. सीमेंट काँक्रीटीकरणाचे जे रस्ते अर्धवट आहेत, त्या रस्त्यांच्या काही भागात ठेकेदाराने डांबरीकरणाचे रस्ते केले आहेत. ते रस्ते पहिल्या पावसात वाहून गेले आहेत. रस्ता तात्पुरता असला तरी केलेल्या कामासाठी महापालिका पैसा मोजते. त्यामुळे अशा बेफिकीर ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली. यावेळी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी, रस्त्यांची चाळण झाल्याची कबुली सभागृहात दिली. सीमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्ण झाले नाहीत, त्या ठिकाणी तात्पुरते डांबरीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ते पावसामुळे उखडले आहेत. सीमेंट रस्ते करताना काही तांत्रिक अडथळे आहेत, असेही यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.