संपामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

किरकोळ विक्रेते आणि खरेदीदारांच्या अचानक संपामुळे  मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांना निम्म्या दराने मालाची विक्री तर पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांना आपला माल फेकून द्यावा लागला. कृषी उत्पन्न बाजार समितीने सहकार्य केल्याने काही शेतमालाची विक्री होऊ शकली. संपामुळे शेतकरी आणि आडत्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पणन विभागाने खरेदीदाराकडून आडत कापण्याचा निर्णय  घेण्यात आला. बाजार नियमनमुक्तीचाही निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला. याच्या निषेधार्थ आडतदारांनी बंद पाळला. सरकारने मध्यस्थी करत बाजार नियमन दोन्हीकडे समान ठेवण्याचा निर्णय घेत आडत ही खरेदीदाराकडूनच वसूल करण्याचा तोडगा काढला. आडतीसंदर्भात 6 डिसेंबर नंतर चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असेही आडतदारांना आश्‍वासन दिले. निर्णयाची अंमलबजावणी करताना आडत्यांनी शेतकर्‍यांकडून आडत न कापता ती खरेदीदारांकडून कापण्यास सुरुवात केली. परंतु, त्याला खरेदीदारांनी विरोध केला.  काही किरकोळ विके्रते आणि खरेदीदारांनी शनिवारी रात्री माल खरेदी न करण्याची भूमिका घेतली. रविवारी मार्केटयार्डात आठवड्यातील सर्वाधिक आवक होते. बाजारामध्ये 225 ट्रक शेतमालाची आवक झाली. परंतु, खरेदीदारांच्या पवित्र्यामुळे शेतमाल पडून राहिले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, सचिव डॉ. पी. एल खंडागळे, संचालक राजेंद्र कोरपे, संतोष खांदवे, संचालक मंडळ आणि अधिकार्‍यांनी खरेदीदारांशी चर्चा केली. परंतू तरीही खरेदीदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर सभापतींनी कारवाई करण्याचा इशारा दिला. या कारवाईचा विचार करीत खरेदीदारांनी सकाळी 8 नंतर माल खरेदी करण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक मालाची विक्री झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *