कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाच्या धर्तीवर राज्यातही दहावीच्या परीक्षेत यंदा नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये त्यांची लगेच फेरपरीक्षा घेऊन महिन्याभरात निकाल लावायचा. त्यासोबतच याच शैक्षणिक वर्षात अकरावीच्या प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी घेतला आहे.
नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैच्या दुस-या आठवडय़ात घेतली जाणार असून २० ऑगस्टच्या दरम्यान निकाल जाहीर केला जाईल. यामुळे या विद्यार्थ्यांना १ सप्टेंबरपासून याच शैक्षणिक वर्षात अकरावी अथवा इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळण्याची संधी मिळेल.
दहावीच्या परीक्षेला नियमित १५ लाख ७२ हजार २६८ तर पुनर्परीक्षार्थीमधून १ लाख ५२ हजार ५५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १५ लाख १३ हजार १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर २ लाख ११ हजार ६३१ (नियमित १.५० लाख) म्हणजेच एकुण विद्यार्थ्यांच्या आठ टक्केच्या दरम्यान विद्यार्थी नापास झाले आहेत.

