भारत आणि चीनमध्ये अधिक समन्यायी द्विपक्षीय व्यापार व्हावा, असे सांगतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिनी बाजारपेठांनी भारतीय उत्पादनांना अधिक संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. औषधे, आयटी आणि आयटीसंबंधित तसेच कृषी उत्पादनांना जास्त प्रवेश मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.
भारत आणि चीन यांच्यातील व्यापार समतोल सध्या चीनच्या बाजूने झुकणारा आहे. परंतु चीनबरोबर आमचा व्यापार अधिक समन्यायी होण्याच्या दृष्टीने आम्ही पाहत आहोत, असे राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले. भारत-चीन बिझनेस फोरमच्या बैठकीला ते संबोधित करत होते.
एप्रिल ते जानेवारी २०१५-१६ दरम्यान भारत व चीन यांच्यातील व्यापारी तूट ४४ अब्ज ७० कोटी डॉलर इतकी वाढली आहे. मुखर्जी यांनी चिनी गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य वातावरण राहील, असे आश्वासन दिले.
भारताच्या मेक इन इंडियासारख्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही केले. भारतातील तुमची गुंतवणूक नफ्याची कशी ठरेल, ते आम्ही पाहू. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांच्या विकासामुळे समोर येणा-या संधीचा फायदा आम्ही घ्यायला हवा, असे ते म्हणाले.