जम्मू काश्मीरमधील पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती उभारणार नसल्याचे जम्मू-काश्मीर सरकारने स्पष्ट केले आहे. फुटीरतावाद्यांच्या प्रचंड दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सैनिक आणि पंडितांच्या वसाहती उभारण्याचा निर्णय झाला तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा राज्यातील फुटीरतावाद्यांनी दिला होता. त्यासाठी अलिकडेच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष यासीन मलिक यांनी काही फुटीरतावादी नेत्यांची भेट घेऊन या प्रस्तावाबाबतची पुढील धोरणे निश्चित केली होती. तर बुधवारी “हुरियत‘चे अध्यक्ष मिरवेझ उमर फारूक यांनीही 2008 प्रमाणे मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारचे प्रवक्ते नयीम अख्तर यांनी अशा प्रकारच्या स्वतंत्र वसाहती उभारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “जे पंडित त्यांनी सर्वांसोबत राहावे. आम्ही त्यांच्यासाठी संमिश्र वसाहती उभारू. तसेच सरकारच्यावतीने काश्मिरी पंडितांच्या वसाहती उभारण्यासाठी राज्यात जागेचा कोठेही शोध घेण्यात आलेला नसल्याचेही ते म्हणाले. तर सैनिकांच्या वसाहतीचा प्रस्ताव ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील यापूर्वीच्या सरकारने आणल्याचेही सांगितले.