दिवा-मुंब्रा खाडीत रेतीमाफिया जोरात

दिवा, मुंब्रा या भागातील खाडीत सध्या रेतीमाफियांच्या कारवाया मोठय़ा प्रमाणात सुरू असून दररोज लाखो ब्रास रेतीचा अवैध पद्धतीने उपसा करण्यात येत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असून त्यामुळे या भागातील स्थानिक वैतागले आहेत. या रेतीमाफियांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुंब्रा, दिवा, मोठा गाव या भागाला मोठा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीत रेतीमाफिया सरकारचे महसुली नुकसान करून मोठय़ा प्रमाणात रेती उत्खनन करतात. या माफियांवर ठाण्याच्या माजी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी चांगलाच वचक बसवला होता.

थेट उत्खननाच्या ठिकाणी जाऊन अनेकदा मोठय़ा आणि धडक कारवाया करत त्यांनी रेतीमाफियांचे कंबरडे मोडले होते. त्यांची कोटय़वधी रुपयांची साधनसामग्रीही त्यांनी जप्त केली होती. मात्र त्यांची बदली होताच रेतीमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

मुंब्रा रेल्वे पुलाच्या बाजूला, मुंब्रा आणि दिवा यामधील खाडीत, दिवा आणि मोठा गाव यांमधील खाडीत रेतीउपसा करून रेल्वे रुळांच्या अगदी बाजूलाच रेतीचे मोठे ढीग रचण्याइतपत त्यांची हिंमत वाढली आहे.

जोशी यांच्या बदलीनंतर याच रेतीमाफियांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे नवे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीही शासनाचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान करणा-या या रेतीमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *