एका पाकिस्तानी महिलेला 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.
गुरदासपूरमधील कादिया भागात राहणाऱ्या ताहिरा हुजूर यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र उपायुक्त प्रदीप सबरवाल यांच्या हस्ते देण्यात आले. 33 वर्षीय ताहिरा यांनी मकबूल अहमद यांच्याशी 2003 मध्ये विवाह केला होता. सात वर्षे त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मार्च 2011 मध्ये त्यांनी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. पंजाब सरकारनेही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने ताहिरा यांना भारतीय नागरिकत्व दिले आहे. त्यांना कादियामधून इतरत्र बाहेर फिरण्यास मनाई होती. पण, आता त्या भारतात कोठेही फिरू शकणार आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे.
ताहिरा या मुळच्या पाकिस्तानमधील फैसलाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आता भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर सर्वप्रथम पाकिस्तानला जाऊन आईची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यांची आई गेल्या काही वर्षांपासून आजारी आहे. त्यामुळे त्या पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज करणार आहेत.