हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा आज सत्कार सोहळा

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा आज सत्कार सोहळा

आपल्या जीवाची पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण केलेल्या गिरणी कामगार आणि शेतक-यांचे स्मरण करणारा आगळावेगळा कार्यक्रम शनिवारी मुंबईत पार पडणार आहे. १ मे ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’चे औचित्य साधत ‘स्वाभिमान संघटने’चे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील १०६ हुतात्म्यांना अभिवादन करणारा एखाददुसरा कार्यक्रम सरकारी स्तरावर पार पडला आहे. मात्र एका संघटनेने स्वत:हून पुढाकार घेत हुतात्म्यांच्या लढय़ाला उजाळा देत हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करणारा सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच पार पडत आहे. शनिवार ७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

सोहळ्याच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. राजेंद्र पै, साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन ईटकर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात हुतात्म्यांच्या सात कुटुंबीयांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात येणार आहे. दत्ता घाडीगावकर (हुतात्मा सीताराम घाडीगावकर यांचे ज्येष्ठ बंधू), सुलक्षणा सुधाकर गिरकर (हुतात्मा अनंत गोलतकर यांच्या कन्या), रंजना मारूती कनसी (हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या कन्या), सुधीर रामनाथ अमृते (हुतात्मा रामनाथ पांडुरंग अमृते यांचे सुपुत्र), रमेश लक्ष्मण थोरात (हुतात्मा लक्ष्मण नरहरी थोरात यांचे सुपुत्र), परेश प्रकाश पवार (हुतात्मा सीताराम बालाजी पवार यांचे नातू) आणि प्रवीण बांदेकर (हुतात्मा मधुकर बांदेकर यांचे कनिष्ठ भाऊ) या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालून आली आहे. तेव्हा उराशी अखंड महाराष्ट्राचा विचार बाळगून मोठय़ा संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *