नागपूर-भुसावळ लोहमार्गावरील माना (जि. अकोला) या रेल्वेस्थानकामध्ये पुरेसे पिण्याचे पाणी नाही. भर उन्हाळ्यात प्रवाशांची पाण्यासाठी होत असलेली धावपळ पाहून येथील व्हॉलीबॉलपटूंनी एक निर्णय घेतला. स्वतःपैशातून थंड पाण्याच्या कॅन विकत घेऊन त्यातील पाणी स्थानकात थांबलेल्या रेल्वेगाडीतील प्रवाशांना निःशुल्क पाजणे सुरू केले.
बडनेऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या माना रेल्वेस्थानकामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. प्रवाशांना पिण्यासही पाणी मिळत नाही. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांचा जीव तहानेने व्याकूळ होतो. मग तहान भागविण्यासाठी ते गाडीतून उतरून फलाटावर पाण्याचा शोध घेत फिरतात. यात गाडी सुटण्याच्या भीतीपोटी अनेकांची तारांबळ होते. हे रोजचे दृश्य येथील महंमद नतीक, म. असीम, रियाज उद्दीन, म. रिजवान, म. नतीक, म. सलीम, नवेद, म. ग्यासू म. शारुख या तरुणांच्या ध्यानात आले. त्यांना प्रवाशांची पाण्यासाठी होणारी धावपळ पाहवली नाही. ते दररोज पिण्याच्या पाण्याच्या कॅन विकत घेतात आणि रेल्वे प्रवाशांना थंड पाणी पाजतात. या युवकांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, आमची आठ ते दहा युवकांची व्हॉलीबॉल चमू आहे. आम्ही दररोज शर्यत लावायचो. यात 100 ते 200 रुपये खर्च व्हायचे. एकदिवस वडीलधाऱ्या मंडळींनी आम्हाला यापेक्षा वेगळा सामाजिक उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. तेव्हा सर्वांनी रेल्वेप्रवाशांना थंड पाणी पाजण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आम्ही 30 ते 40 कॅन पाणी दररोज विकत घेतो आणि ट्रॅक्टरद्वारे ते रेल्वेस्थानकात आणून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी देतो. या उपक्रमासाठी आम्हाला दररोज 300 ते 400 रुपये खर्च येतो. पण, मनाला समाधान मिळणारे कार्य आपल्या हातून घडत असल्याचा आनंदही होतो.