छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 53 जण जखमी झाले आहेत. कोरड्या नाल्यात पडून या बसचा अपघात झाला. ही खाजगी लक्झरी बस झारखंडमधून रायपूरला जात असताना रात्री 10.30 च्या दरम्यान हा अपघात झाला.
समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमी असलेल्या 16 प्रवाशांना अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. तर किरकोळ जखमी असलेल्या 37 जणांना बलरामपूरमधील रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण पुरुष आहेत. मुख्यमंत्री रमण सिंग यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाला जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.