पालघर तालुक्यातील वरई सफाळा राज्य महामार्गावर रेतीच्या ट्रकला सहा आसनी रिक्षाने दिलेल्या धडकेत एका गरोदर महिलेसह चार महिला जागीच ठार झाल्या तर आरोग्य विभागाच्या दोन कार्यकर्त्या जखमी झाल्या आहेत. रेतीच्या ट्रकमुळं अपघात होण्याची पालघर तालुक्यातील ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई ते सफाळा राज्य महामार्गावर गुंदावे येथे ही दुर्घटना घडली. नावजे गावातील एका गरोदर महिलेला पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी एका सहा आसनी मॅजिक रिक्षाने मनोर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात येत होते. तिच्यासोबत आरोग्य विभागाच्या दोन ‘आशा’ कार्यकर्त्यादेखील होत्या. गुंदावे गावाजवळ भर रस्त्यात एका वळणावर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला या सहा आसनी रिक्षाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात रिक्षाचा चक्काचूर झाला आणि महिला जागीच ठार झाल्या. जखमींना ठाणे तसेच मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गेल्या आठवडयात तादुंळवाडी चहाडे मार्गावर रात्रीच्या वेळी रेतीच्या ट्रकने एका २७ वर्षीय तरुणाचा बळी घेतला होता. गेल्या दोन वर्षांपासून पालघर तालुक्यात रेती उत्खननाला बंदी आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रात्रीच्या वेळेस या रेतीची मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई भागांत विक्री केली जाते. परवाना नसल्याने बेकायदा रेती ठिकाणावर लवकर पोहोचावी यासाठी ट्रक बेफाम वेगाने नेले जातात. त्यातून अपघात वाढल्याचे सांगितले जाते. महसूल व पोलीस यंत्रणा बेकायदा रेती उत्खननाविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने वाळूमाफियांचे फावले आहे.