आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे दुवाडा येथील एका बायो-डिझेल उत्पादने बनवणा-या कारखान्याला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. जिथे ही आग लागली तो भाग विशेष आर्थिक विभाग आहे. मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे, असे दलाच्या अधिका-याने सांगितले. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते.
विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी एन. युवराज यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.
बायोमॅक्स फ्यूल्स लिमिटेड या जैव डीझेल इंधन असलेल्या कंपनीला मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या कंपनीत जैव डीझेल इंधनाच्या १८ टँक असून त्यात पाच लाख टन इंधन साठवून ठेवण्याची क्षमता आहे. या १८ पैकी १२ टँकना आग लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बुधवारी सकाळीसुद्धा काही टँकमधून धुराचे लोळ निघत होते. सर्वच टँकमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने त्यांना संपूर्ण जळू दिल्यानंतरच आग पूर्णपणे विझवली जाणार असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
दरम्यान घटनास्थळी कंपनीतील १५ कर्मचारी होते. त्यांना तत्काळ बाहेर काढल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नौ सेना, विशाखापट्टणम इस्पात संयंत्र आणि पोर्ट ट्रस्ट तर्फे संयुक्त मोहीम राबवण्यात आल्याचे विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी एन. युवराज यांनी सांगितले.
ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे जिल्हा अग्निशमन अधिकारी जे. एम. राव यांनी सांगितले.