उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच प्रवासात जर पाणी विकत घ्यायचे म्हटले, तर 20 रुपये मोजावे लागतात. मात्र, जर कोणी शुद्ध पाणी मोफत वाटप करीत असेल, तर प्रवासी त्याला “दुआ‘ देणारच यात शंका नाही. औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर पार्किंगची व्यवस्था सांभाळणारे सय्यद मजहर उद्दिन हे फेब्रुवारी महिन्यापासून फिल्टर केलेले थंड पाण्याचे जार घेऊन पाणीवाटप करत आहेत.
सय्यद मजहर उद्दिन हे 20 लिटर पाण्याचा एक जार असे दररोज 25 जार विकत घेतात. एक जार त्यांना 30 रुपयांना मिळतो. प्रवाशांच्या पाण्याच्या सोयीसाठीची ही तळमळ पाहत, किशनचंद तनवाणी यांनीसुद्धा प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दररोज 15 जार देऊ केले आहेत.
पाणी बाटने से दुआं मिलती है
उन्हाळ्यात सर्वत्र लाहीलाही होते. तीन वर्षांपासून तर दुष्काळाचे संकट कायम आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासते आहे. मी पाणीवाटप करतो. त्यातून प्रवाशांचा आशीर्वाद मिळतो; पण सध्या हे पाणी दिवसाकाठी पुरत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सेवाभावी संस्थांनी यात सहभाग घेतला तर हे कार्य आणखी वाढेल, असे मजहर उद्दिन म्हणाले.
