पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणाऱ्या पाकिस्तानच्या संयुक्त चौकशी पथकाने (जेआयटी) हा भारतानेच रचलेला ड्रामा असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे जेआयटी पथक नुकतेच भारतात आले होते. या पथकाने पठाणकोट येथील हवाई तळाला भेट देऊन चौकशी केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांसोबतही त्यांची चर्चा झाली होती. पाकिस्तानच्या पथकात आयएसआयच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याने या पथकाला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला होता. आता या पथकाने पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर भारतावरच आरोप केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
जेआयटीमधील एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितानुसार,पठाणकोटमधील हल्ला हा भारतीय प्रशासनानेच घडवून आणला होता. चौकशीवेळी या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा एकही पुरावा भारत सादर करु शकला नाही. हा हल्ला भारतानेच रचलेला कट होता आणि यातून पाकिस्तानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका मुस्लिम एनआयएच्या अधिकाऱ्याच्या हत्येमुळे हे स्पष्ट झाले आहे.
