राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत 10 टक्के कमी प्रदूषण झाल्याचे समोर आले आहे.
केजरीवाल यांनी चारचाकी वाहनांना त्यांच्या सम-विषम क्रमांकानुसार रस्त्यावर उतरण्यासाठीची नवी योजना आणली आहे. या योजनेची 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी या योजनेला दिल्लीवासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला. केजरीवाल यांनी आपल्या मोटारीतून परिवहन मंत्री गोपाल राय आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कार्यालयात पोचविले. तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सायकलवरून कार्यालय गाठले. नियमभंग केल्याप्रकरणी एकूण 150 जणांकडून दंड वसूल करण्यात आला. इतर दिवसांच्या तुलनेत रस्त्यावर तब्बल 10 लाख वाहने कमी दिसले. दरम्यान रस्ते रिकामे असून इतर दिवसांच्या तुलनेत आम्ही अर्ध्या वेळेतच कार्यालय गाठल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत बोलताना केजरीवाल यांनी “राजधानी दिल्ली देशाला रस्ता दाखवेल‘, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पहिल्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी दोनच्या दरम्यान 10 टक्के प्रदूषण कमी आढळले. मात्र दोन-तीन दिवसांनंतर नेमका परिणाम दिसून येईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.