कोकण रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम यंदा पूर्ण होणार असून त्यामुळे या मार्गावरील गाडय़ांचा वेग अधिक वाढणार आहे, असा दावा मध्य रेल्वेने केला.
मध्य रेल्वेकडून रोहापर्यंत दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल ते रोहा या टप्प्यातील कासू ते नागोठणे दरम्यानचे काम येत्या काही दिवसांत मार्गी लागेल. तर उर्वरित नागोठणे ते रोहा या १३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम या वर्षाअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील मेल एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळेत १० ते १५ मिनिटांची बचत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
सध्या या रेल्वेमार्गावरील पॅसेंजरला दिवा ते रोहा हे अंतर पार करण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो. तर एक्स्प्रेसना दोन तास लागतात. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पॅसेंजरला तीन तासांपेक्षा कमी आणि एक्स्प्रेसना पावणे दोन तासांचा वेळ लागणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. कोकण रेल्वेच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी मात्र दहा वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
खोळंब्यातून होणार मुक्ती
कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गामुळे दक्षिणेकडे जाणा-या गाडय़ांना मार्ग देण्यासाठी कोकणातील गाडय़ांना कायमच क्रॉसिंगसाठी थांबवण्यात येते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा अर्धा ते एक तास खोळंबा होतो. त्यामुळे प्रवाशांमध्ये कायमच नाराजी पसरते. यात पनवेल ते दिवा स्थानकांमध्ये होणारी रखडपट्टी अधिक आहे.
असा आहे दुहेरीकरणाचा टप्पा
प्रवासाचे अंतर : १०१ किलोमीटर दिवा ते पनवेल, पनवेल ते कासू या टप्प्यातील काम पूर्ण कासू ते नागोठणे (१३ किमी) लवकरच मार्गी लागणार नागोठणे ते रोहा वर्षभरात होणार पूर्ण.
काय होणार फायदा?
पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत १० तर एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळेत १५ मिनिटांची होणार बचत माल वाहतुकीचा वेग वाढणार प्रवाशांची खोळंब्यातून मुक्तता दिवा-रोहा शटल सेवेत होऊ शकते वाढ.
माल वाहतुकीला होणार फायदा
कोकणातील बंदरे रेल्वेला जोडण्याचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेच्या दुहेरीकरणाचा फायदा मालवाहतुकीला होणार आहे. कोकण रेल्वेमार्गावरून सध्या मोठय़ा प्रमाणात माल वाहतूक केली जात असल्याने दुहेरीकरणामुळे माल वाहतुकीचा वेग वाढणार आहे. त्यामुळे नावा-शेवा बंदराकडे मालाची ने-आण करताना लागणारा वेळ वाचेल. परिणामी माल वेळेत पोहोचणे शक्य होईल, त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होईल, असा दावाही रेल्वेचे अधिकारी करीत आहेत.