पठाणकोट येथील लष्कराच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी आज (शनिवार) पहाटे हल्ला केला असून यामध्ये चार दहशतावाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर दोन जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान पठाणकोट हवाई दल केंद्रावर सुरक्षा दलाचे जवान व दहशतावाद्यांमध्ये चकमक सुरुच असून आहे.
आज सकाळी साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या वेषातील साधारण चार दहशतवाद्यांनी भींतीवरून उड्या मारून हवाई दलाच्या तळाजवळ हल्ला केला. पहाटे साडेतीन वाजल्यापासून पठाणकोट राष्ट्रीय सुरक्षा पथक आणि गरुड कमांडो फोर्स यांनी हा हल्ला उधळून लावला. त्यानंतर जम्मू-पठाणकोट महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून दहशवाद्यांशी चकमक सुरुच आहे.
या हल्ल्यात एकूण चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दोन जवान हुतात्मा झाल्याचे वृत्त आहे. भारत-पाकिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये अडथळे आणण्यासाठी लष्करे तैयबाने हा हल्ला घडविला असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलाविली आहे.