शहापूर तालुक्यातील चांग्याचा पाडा या दुर्गम वस्तीत एबीएम समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने मुलींची निवासी शाळा चालवली जाते. ही शाळा मुंबईतील माझगाव शिपयार्ड या नौदल अधिका-यांच्या संस्थेने पुढील ३ वर्षासाठी दत्तक घेतली. आदिवासी कातकरी समाजाच्या मुलींना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागील १४ वष्रे या शाळेच्या माध्यमातून कार्य केले जात आहे.
या शाळेत आदिवासी समाजातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या १०७ विद्यार्थिनी शिक्षण घेत असून या मुलींना संस्थेकडून शालेय शिक्षणासोबतच शिवणकामाचे धडेही दिले जातात. शासनाचे कुठलेही अर्थसहाय्य न घेता सुरू असलेले हे काम अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी माझगांव डॉकयार्डचे शिपबिल्डचे चेअरमन राहुल श्रावत यांची संस्थेचे अध्यक्ष सीताराम गायकवाड यांनी भेट घेऊन ही दत्तक घेण्याची विनंती केली होती.
यानंतर नुकत्याच पार पडलेल्या या दत्तक घेण्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, नौदल संस्थेचे हिरेन देसाई, जे. जी. यादव तसेच या शाळेला जमीन उपलब्ध करून देणारे शेतकरी दामोदर सीताराम विशे, मुख्याध्यापक मीना जाधव, संस्थेचे संस्थापक पी. बी. भडांगे, पद्माकर केव्हारी, अतुल भडांगे आदी मान्यवर उपस्थित होते.