मुंबईसह राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुजरातच्या धर्तीवर तिथी भोजन मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये यशस्वी झालेल्या या योजनेअतंर्गत राज्यात तिथी भोजन सुरू करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना डायफ्रूट, मिठाई आणि नमकीनची चव चाखायला मिळणार आहे. यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तावडे यांच्या दालनात बुधवारी यासंदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. शिक्षणमंत्री म्हणाले, ‘शालेय माध्यान्ह भोजन योजनेला अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये ‘तिथी भोजन’ दिले जावे, अशी योजना आणली आहे. पोषण आहार सुधारणेबरोबरच काही विशिष्ट दिनी विद्यार्थ्यांना विशेष आहार दिला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्नपदार्थांची चव चाखता येणार आहे. मात्र, असे असले तरी या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिले जाणारे भोजन चांगल्या प्रतीचे असणे आवश्यक आहे. तिथी भोजन उपक्रमात भोजनाव्यतिरिक्त मिठाई, नमकीन, ड्रायफ्रूट, फळे यांचाही समावेश करण्यात यावा. तसेच या योजनेची व्याप्ती, अंमलबजावणी आणि तिचे स्वरूप निश्चित करण्यासाठी संबंधित विभागाने याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय या योजनेचे नाव तिथी भोजन असले, तरी पर्यायी नाव अभ्यास गटाने सुचवावे, असेही तावडे यांनी यावेळी जाहीर केले.