डाळींच्या किमतींवर लगाम लावून त्या नियंत्रणात आणायच्या असतील तर एक कोटी टन डाळींची आयात करावी लागेल. उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ संस्था असलेल्या ‘ऍसोचॅम‘च्या अभ्यासामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
डाळींची मागणी आणि पुरवठा यामधील तफावत कमी करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डाळी आयात करण्याची आवश्यकता आहे, असे ‘ऍसोचॅम‘ने म्हटले आहे.
यंदा डाळींच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये भारताने 44 लाख टन डाळींची आयात केली होती. यंदा पाऊस कमी झाल्याने डाळींचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, असे अभ्यास अहवालात म्हटले आहे. मागील वर्षात 1 कोटी 72 लाख टन डाळींचे उत्पादन झाले होते. या वर्षी हे उत्पादन घटून 1 कोटी 70 लाख टन होईल. तसेच, डाळींना मागणीही वाढेल, त्यामुळे आणखी एक कोटी टन डाळींची आयात करणे आवश्यक असल्याचे ‘ऍसोचॅम‘च्या अहवालात म्हटले आहे.