मे महिना संपत आला असून जून महिन्याची सुरूवात होणार आहे. जून महिना म्हटलं की पालक आणि विद्यार्थ्यांची नवीन शालेय वर्षासाठीची लगबग सुरु होते. राज्यात 15 जूनपासून शाळा सुरु होतात. पण राज्यातील शाळेच्या टाइमिंग आणि दिवसांबद्दल मुंबईतील स्कूल बस ओनर्स असोसिएशनने राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव ठेवला आहे की, नवीन शालेय वर्षात आठवड्यातील 3 दिवस शाळा ठेवावी. तर इतर 2 दिवस ऑनलाइन वर्ग भरवण्यात यावे. त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, दिवसाआड शाळा भरवावी. एवढंच नाहीतर शाळेत सत्रही एकाच वेळी भरवण्यात यावे. कारण अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या सत्रात शाळा भरवण्यात येतात.
