युवकाचा मृत्यू झाल्याने काश्मीरमध्ये हिंसाचार

युवकाचा मृत्यू झाल्याने काश्मीरमध्ये हिंसाचार

काश्मीर खो-यातील उधमपूर येथे ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या पेट्रोल बॉम्बहल्ल्यातील जखमी युवकाचा दिल्ली येथे मृत्यू झाल्याचे वृत्त येताच काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला. जम्मू श्रीनगर महामार्गावर ठिकठिकाणी टायर्स जाळण्यात आले आहेत. त्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील जाहीद रसूल हा १६ वर्षाचा युवक ट्रक क्लिनर म्हणून नोकरी करत असे. त्यादिवशी ट्रकवर जमावाने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर नवी दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी साडेअकरा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर वृत्त समजताच उधमपुर आणि अनंतनाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्यात आला. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. काही ठिकाणी अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडल्या.

या हल्ल्यात ट्रकचालक शौकत अहमद दार (३६) जखमी झाला असून त्याच्यावर देखील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पेट्रोल बॉम्ब हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी हरीश कटोच, बाल बहादुर, संदूर सिंह आणि सुनीत सिंह या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

हा ट्रक जम्मू येथून श्रीनगरला जात होता. मात्र विविध हिंदू संघटनांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर आंदोलन करुन महामार्ग बंद पाडल्याने हा ट्रक शिवनगर येथे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. या ट्रकची काच फोडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. यामुळे लागलेल्या आगीत ट्रकमध्ये झोपलेले चालक शौकत अहमद आणि क्लिनर जाहीद रसूल गंभीर भाजले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *