व्हिसामध्ये अडचण, 700 किमीचा प्रवास अन् अखेर महाराष्ट्र; विशाखा सुभेदार यांचा मुलगा अखेर घरी परतणार, फडणवीसांच्या प्रयत्नांना यश

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती आहे. युद्धामुळे अनेक भारतीय या देशांमध्ये अडकले असून, यात मराठी नागरिकांचाही समावेश आहे. शेकडो मराठी नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. यामध्ये मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय देखील आहे. विखाशा सुभेदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला मुलगा कुवेतमध्ये अडकल्याचं सांगत मदतीसाठी सरकारकडे विनंती केली होती. यानंतर राज्य सरकार त्यांच्या मदतीला धावलं असून, मुलाला सुखरुप घरी आणत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

अभिनयहे कुवेतमार्गे लंडनला निघाला होते. कुवेत येथे त्याचा ट्रान्झिट थांबा होता. याच दरम्यान इराणने कुवेतवर ड्रोन व मिसाईल हल्ले सुरू केल्याने कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणे रद्द केली. त्यामुळे अभिनय व त्याच्यासह अन्य मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे लंडनला जाणे किंवा मायदेशी परतणे यातील कोणतीच शक्यता दृष्टिक्षेपात नसताना युद्धाचीही झळ सोसण्याची भीती निर्माण झाली. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्याने जीवाचा प्रश्न निर्माण झाला.

विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. विशाखा सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने पावले उचलत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेश मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करण्यास सांगितले .

कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार व अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) येथून भारतात परत आणण्याचे नियोजन झाले. मात्र अभिनय सुभेदार यांच्यासह अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदारसह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गती मिळाली आणि अभिनय यांच्यासह अन्य 30 महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे 700 किलोमीटर अंतराचा दहा तास प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले.

यानंतर रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइटद्वारे त्यांच्या परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला. यानुसार आज दिनांक 9 मार्च रोजी रियाधहून हे विमान रात्री 8.4 वाजता (रियाध वेळ) / रात्री 11:10 वाजता (भारतीय वेळ) प्रस्थान करणार असून 10 मार्चच्या मध्यरात्री 3 वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या विमानातून अभिनय सुभेदार यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परत येत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेत येथील भारतीय दूतावासाने मदत केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *