नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीपासून वेगळी राहणारी आणि पदरात 3-4 महिन्यांचे बाळ असलेल्या एका विवाहित महिलेची ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या या महिलेचा 2 लाख रुपयांत सौदा करून तिला नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे जबरदस्तीने विवाहासाठी भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढले
27 फेब्रुवारी रोजी राणी आणि भागी या दोन महिला एजंटांनी पीडितेला संपर्क साधला. “तुला इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो,” असे प्रलोभन तिला दाखवण्यात आले. विश्वास संपादन करून तिला कारमध्ये बसवण्यात आले आणि मालेगावमार्गे थेट नांदगावमध्ये नेण्यात आले. तेथे नवनाथ खिरडकर या तरुणाकडून 2 लाख रुपये घेत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावण्यात आल्याचा आरोप आहे.
300 ग्रामस्थांच्या वेढ्यातून सुटका
लग्नानंतर पीडिता पूर्णपणे हादरली होती. 28 फेब्रुवारी रोजी तिने कसाबसा आईशी मोबाईलवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांचे पथक तातडीने जातेगावला रवाना झाले. मात्र तेथे सुमारे 300 नागरिकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी संयम आणि धाडस दाखवत जमावाला बाजूला सारले आणि महिलेची सुरक्षित सुटका केली.
2 महिलांना अटक, 6 जण फरार
या प्रकरणात राणी आणि भागी या दोघींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आणखी 6 जणांचा सहभाग समोर आला असून ते सध्या फरार आहेत. संशयित महिला सातपूर परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त परिक्षेत्र झोन 2 किशोर काळे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिस तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे
