अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारातील माऊली मंदिराजवळ आज मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे (वय 22, रा. काष्टी) यांच्यासह गाडीत प्रवास करणारे गजानन जनार्धन पायघन (वय 47 ), दुर्पा गजानन पायघन (वय 36) आणि त्यांचा मुलगा वैभव गजानन पायघन (वय 19) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कुटुंबातील करण गजानन पायघन (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पायघन कुटुंब मूळचे अकोले तालुक्यातील पातूर येथील मळतूर गावचे असून, कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. आज मंगळवारी पहाटे ते गावाकडून चिंभळेकडे येत असताना कोळगाव शिवारात दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या इको कारला समोरून जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
पती-पत्नीसह तरुण बेपत्ता
जिल्ह्यातील पैठण तालुक्याततील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघा झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.
