सोळा-सतरा दिवसांपूर्वी घराबाहेर पडताना चेहऱ्यावर भक्तीचा आनंद होता, मनात बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची ओढ होती. “लवकरच दर्शन घेऊन परत येतो,” असे घरच्यांना सांगून निघालेले ते तीन मित्र परतले खरे, पण नियतीने घात केला. गुजरातमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात पुण्याच्या मांजरी परिसरातील तीन जिवलग मित्रांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण मांजरी बुद्रुक परिसरावर शोककळा पसरली असून, हसत्या-खेळत्या कुटुंबांचा आधार हरपला आहे.
१८ दिवसांचा प्रवास आणि घात
मांजरी येथील तेजस देविदास दगडे (वय २६), अभिषेक यादव (वय २६) आणि सचिन बिरादार (वय २७) हे तिघे मित्र १८ दिवसांपूर्वी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी पुण्यातून उत्साहाने निघाले होते. दर्शन आटोपून परतीचा प्रवासही त्यांनी सुरू केला होता. मात्र मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास इंदूर-अहमदाबाद महामार्गावरील दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथे या मित्रांवर काळाने घाला घातला. धाधेला वळणावर त्यांची कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला जोरात धडकली.
