मुंबईतून आताची सर्वात मोठी घटना समोर येत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे (Taxiway) वर घडली. विशेष म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना यामुळे टळल्याचं आता बोललं जात आहे. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेमुळे हादरला आहे. त्यानंतर आज रात्री मुंबई विमानतळावर अनपेक्षित घटना घडली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आहे.
एअर इंडिया आणि इंडिगोच्या या दोन विमान कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले आहेत. या दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते. एअर इंडियाचे AI 2732 हे विमान मुंबईहून कोइम्बतूरच्या दिशेला जाणार होतं. ते धावपट्टीवर थांबलं होतं. तर इंडिगोचं 6E 791 हे विमान हैदराबादहून मुंबई विमातळावर लँडिंग केल्यानंतर टॅक्सी-वेवरून पार्क होण्यासाठी जात होतं. याच दरम्यान ही दोन्ही विमाने टॅक्सी-वेवर असताना त्यांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली गेली. दोन्ही विमानांचे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “मुंबईहून कोइम्बतूरला जाणाऱ्या AI 2732 या विमानाला उशीर झाला. हे विमान उड्डाणापूर्वी टॅक्सी-वेवर (धावपट्टीकडे जाताना) थांबलेले असताना, या विमानाचा दुसऱ्या एका विमान कंपनीच्या विमानाशी स्पर्श झाला. या दोन्ही विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंडेड (तूर्तास सेवेतून बाहेर) करण्यात आले आहे”, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.
