मुंबईकरांना डेंग्यूचा धोका

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, ऑक्टोबर महिन्यात उष्णता प्रचंड असल्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट होईल, असे वाटत होते. मात्र ऑक्टोबर महिन्यातही डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच असल्याने नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबईकरांनी डेंग्यूची भिती न बाळगता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, जेणेकरून आजारावर मात करता येईल, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

पावसाळ्यात ठिकठिकाणी किंवा झोपडपट्टी परिसरात पाणी साचल्याने त्यात डासांची निर्मिती होण्याची अधिक शक्यता असते. मुख्यत: जून व जुलै या महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या खूपच कमी असते. ऑगस्टमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येतात. पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा हा काळ डेंग्यूच्या विषाणूंसाठी पोषक असतो. त्यामुळे, या कालावधीत रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या आजाराचा प्रभाव अधिक आहे. या आजारामुळे यंदा चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात या आजाराचे चार हजार संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २७५ जणांना लागण झाल्याचे निदान झाले. तर ऑक्टोबर महिन्यात अवघ्या ११ दिवसात डेंग्यूचे ४३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. इतकेच नाही तर तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे. दररोज ४०-५० तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे मुंबईकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *