Mumbai – Pune Expressway : अटल सेतूपासून थेट पुण्यापर्यंत, अडीच तासाचं अंतर 90 मिनिटांत… मुंबई-पुणे 130 किमीचा नवा एक्सप्रेसवे, मार्ग कुठून कसा?

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या महानगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा, घाटातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी दूर करणारा आणि अवघ्या 90 मिनिटांत दोन्ही शहरांमधील अंतर पार करणारा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्त्वाकांक्षी घोषणा केली असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या दळणवळण नकाशावर मोठी क्रांती घडणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करण्यास साधारण अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र सुट्टीचे दिवस, पावसाळा किंवा अपघात झाल्यास खंडाळा घाट परिसरात तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा हा प्रवास चार ते पाच तासांपर्यंत लांबतो. हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने सध्याच्या एक्सप्रेसवेच्या समांतर एक नवा, अत्याधुनिक आणि वेगवान मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अटल सेतू ते पुण्यातील शिवरे जंक्शनपर्यंत मार्ग

हा नवा एक्सप्रेसवे सुमारे 130 किलोमीटर लांबीचा असून, त्याचा अंदाजित खर्च जवळपास 15 हजार कोटी रुपये आहे. हा मार्ग जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी) परिसरातील अटल सेतूजवळून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पगोटे (जेएनपीएजवळ) ते पनवेलच्या चौकपर्यंतच्या मार्गाला आधीच मंजुरी मिळाली आहे.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुपरफास्ट एक्सप्रेसवेवर आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करण्यात येणार असून, वेगवान वाहनांसाठी सुरक्षित लेन, कमी वळणं, दर्जेदार पूल आणि आवश्यक ठिकाणी बोगद्यांचा समावेश असेल. त्यामुळे घाटातील धोकादायक वळणं, अपघातप्रवण भाग आणि सततची कोंडी टाळता येणार आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ 90 मिनिटांत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे राज्याबाहेरील प्रवासालाही चालना मिळणार आहे. गडकरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, की हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई-बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास अवघ्या साडेपाच तासांत शक्य होईल. त्यामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. विशेषतः आयटी, ऑटोमोबाईल, बंदरांशी संबंधित उद्योग आणि निर्यातदारांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, नितीन गडकरी यांनाच 2002 साली सुरू झालेल्या विद्यमान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे शिल्पकार मानलं जातं. त्या काळात हा प्रकल्प देशासाठी मैलाचा दगड ठरला होता. आता त्याच मार्गावर आणखी एक पाऊल पुढे टाकत, अधिक वेगवान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारला जात आहे. मुंबई-पुणे दरम्यानचा हा नवा एक्सप्रेसवे म्हणजे केवळ रस्ता नसून, तो राज्याच्या आर्थिक प्रगतीचा, आधुनिक दळणवळणाचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *