‘EVM वरचं फक्त भाजपा उमेदवारासमोरचं बटण दाबलं जातंय’; ‘सर्व यंत्रणा…’

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांमध्ये महाराष्ट्रातील सरासरी मतदान हे 7 ते 8 टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबड असल्याने मतदान थांबवावे लागलं आहे. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन अचानक बंद पडत असून ठाण्यात तर एका ठिकाणी ईव्हीएमला शॉक लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, नवी मुंबई, पनवेल सगळीकडेच कोणत्या ना कोणत्या बुथवर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड चर्चेत आहे. असं असतानाच आता धुळ्यातून शिवसेनेच्या उमेदवाराने कोणतंही बटन दाबलं तरी भाजपाला मत जात असल्याचा आरोप केलाय.

मतदान यंत्रांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड

धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या पार्वती जोगी यांनी मतदान यंत्रांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. मतदान यंत्रणामध्ये भाजप उमेदवारासमोरचं बटन दाबलं जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. लोकशाही वेठीस धरलेला गेली असून, सर्व यंत्रणा मॅनेज असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. पार्वती जोगी यांनी मतदान केंद्रांवर भेटी देत त्या ठिकाणी पाहणी केली. त्या स्वतः शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेदवार आहेत.

अर्ध्या तासात ईव्हीएम खराब

धुळ्यात प्रभाग 10, प्रभाग 4 मध्ये मतदान सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासामध्येच ईव्हीएम मशीन खराब झालं. तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडलं. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद झालं. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीनमधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करत काही वेळाने मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.

शाईबद्दलही शंका

राज्यातील अनेक भागांमध्ये मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी शाई पुसून पुन्हा बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्याचा आरोपही केला जातोय. शाईसंदर्भातील गोंधळामुळे निवडणुकींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

आज कुठे कुठे मतदान?

बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *