कष्टाला पर्याय नाही हे जणू जीवनसूत्र, या मार्गाने पती-पत्नी दोघांनी मिळून संसाराचा गाडा हसत खेळत ओढला. पती बस चालक तर पत्नी एका गावातीलच कंपनीतील बस मध्ये सहाय्यक म्हणून नोकरी करत संसाराला हातभार लावत होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाल्याने शेलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मूळचे वाडी महाळुंगी तालुका नांदुरा येथील रहिवासी असलेले अमोल सुरेश शेलकर (वय वर्षे 38) यांचा आठ वर्षांपूर्वी घाटपुरी येथील साबळे कुटुंबातील कन्या रीना तिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही वाडी महाळुंगे येथे वास्तव्यात असलेले अमोल शेलकर हे मागील काही दिवसांपासून खामगाव घाटपुरी येथील गजानन कॉलनीत सासर कडे राहत होते. साबळे कुटुंबियांचे ते लाडके जावई होते. गेल्या तीन वर्षापासून अमोल शेलकर हे साई ट्रॅव्हल्स मध्ये बस चालक म्हणून सेवा देत होते. कष्टाळू मनमिळाऊ व जबाबदार चालक अशी त्यांची ओळख होती.
संसाराला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांच्या पत्नीने ही मागे न राहता खामगाव एमआयडीसीतील एका कंपनीतील बस मध्ये सहाय्यक म्हणून काम करीत होती. पती-पत्नी दोघेही मेहनतीने कुटुंबाचा गाडा ओढत असताना शेलकर दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते घाटपुरी येथील शाळेत शिक्षण घेतात मात्र शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर खाजगी बस व ट्रकचा अपघातात अमोल शेलकर यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर अपघात संकट आलं आणि सर्व काही संपून गेलं. आठवीत शिक्षण घेत असलेला मुलगा आणि त्या तिसरीतील मुलीचे वडील चे छत्र हरपल्याने चिमुकल्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे.
अमोल शेलकर यांच्या आई वडील वाडी महाळुंगी येथे शेती करून उपजीविका निर्वाह करतात. त्यांना तीन मुले असून अमोल शेलकर हा मधला मुलगा होता. हालाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अमोल यांनीही चालकाची नोकरी स्वीकार करून संसाराला हातभार लावला होता. घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब शोक सागरात बुडाले आहे.
अखेरचे पार्थिव दर्शन देखील झाले दुर्लभ..
घरातून निघताना पाहिलेला चेहरा अखेरचा ठरला. परिवार सदस्यांकरिता समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर वाहनाला आग लागल्याने अमोल शेरकर हे भाजले गेले. त्यामुळे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन कुटुंब यांना घेते आले नाही. कामावर निघताना घरातून बाहेर पडताना पाहिलेला चेहराच पत्नी आणि दोन चिमुकल्यांच्या मुलांसाठी अखेरचा ठरला. या हृदयाद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.
