राज्यात तापमानाचा पारा घसरला, विदर्भ, मराठवाड्यात थंडी वाढणार; मुंबईत पुढील 48 तास …

मुंबईकरांची नववर्षाची सुरुवात पावसाच्या सरींनी झाली. हवामान खात्याने थंडीची शक्यता वर्तवली असताना अचानक पावसाच्या हजेरीने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस झाला. तर मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. आता पावसानंतर थंड वारे वाहत असून मुंबई तापमानात घट झाली आहे.

हवामान खात्याने मुंबईत पुढील 48 तास आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात काहीशी वाढ होऊ शकते असा अंदाज देण्यात आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वायू प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे.

पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार

अरबी समुद्रातून येणाऱ्या आद्रता असलेल्या वाऱ्यांमुळे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड प्रवाहामुळे मुंबईत ढगांची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात तापमानात घट झाली आहे. पुढील काही दिवस थंडी आणि धुकं कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात थंडी वाढणार

विदर्भ, मराठवाड्यात थंडीचा कडाका कायम आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही वर्षातील सर्वात थंड डिसेंबर महिना होता. मागील जवळपास 15 दिवसांपासून विदर्भातील तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. पुढील चार दिवस विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडी कायम राहणार आहे. तसंच या भागात धुकंही मोठ्या प्रमाणात राहील. दाट धुक्यामुळे दृश्यमानतेत घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला

महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परभणीमध्ये सर्वात कमी तापमान 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. तर धुळ्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरात थंड वारे वाहत असून पुढील काही दिवस तापमानाची स्थिती अशीच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *