मी जिवंत आहे का, कुठे आहे, मी कसा वाचलो, ते मला माहीत नाही… फक्त समोरून बस येत होती, तितकेच आठवते… इथे मला कुणी आणले, काहीही माहीत नाही…’ भांडुप येथील बसअपघातामध्ये जखमी झालेल्या मंगेश दुखंडे यांना मुलुंडमधील एम. टी. अगरवाल रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आणले, तेव्हा आपल्याला तिथे कुणी आणले असा प्रश्न पडला होता. शुद्धीवर आल्यानंतरही, केवळ समोरून भरधाव येणारी बस त्यांच्या डोळ्यासमोर येत होती. ‘मटा’ने त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या अपघातातून ‘मी कसा वाचलो ?’ असा प्रश्न त्यांनी रडत रडत विचारला.
भांडुप येथे राहणाऱ्या दुखंडे यांचे कुटुंबीय गावी असतात. इथे ते एकटे राहतात. सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात आणले, त्यावेळी त्यांच्यासोबत गावातील नातेवाईक होते. दुखंडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मिळेल ते काम करून ते चरितार्थ चालवतात. त्या अपघाताचा धक्का इतका जबरदस्त होता की, ते थरथर कापत होते. परिचारिकेने त्यांच्या अंगावर दोन ब्लँकेट घातली, तरी त्यांची थंडी कमी होत नव्हती. हातापायाला जखमा झाल्या होत्या. ओठ फाटले होते. त्यातून रक्त येत होते.
कामावरून घरी जाण्यासाठी बसच्या रांगेत उभा होतो. समोरून वेगाने बस आली. पुढे येऊन बस थांबली की, त्यात चढू, या तयारीत होतो. पण काय झाले, कळलेच नाही. बस थांबलीच नाही. मी कुठेतरी फेकला गेलो. बहुदा बसच्या खाली गेलो. बहुतेक चाकाखाली आलो नाही. डोळे उघडले, तर रुग्णालयामध्ये होतो. देवानेच मला वाचवले. हा माझा पुनर्जन्मच आहे हो…’ असे म्हणून दुखंडे ढसढसा रडायला लागले.
कोणी तरी त्यांचा पत्ता, फोन नंबर मागितला. तो देताना त्यांनी तीनदा वेगवेगळे क्रमांक सांगितले. त्यावरून त्यांच्या मनस्थितीची कल्पना येत होती. ‘मला एकटे राहू द्या,’ म्हणत त्यांनी डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. पण डोळ्यांच्या कोपऱ्यांतून ओघळणाऱ्या अश्रृंनी त्यांच्या मनातील अस्वस्थता मूकपणे बोलून दाखवली.
