भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने देशभरातील सुमारे 200 देशांतर्गत उड्डाणे रद्द जाली. अनेक विमानांना विलंब झाला. मुंबई एअपोर्टवर प्रचंड गोंधळ झाला. कारण जाणून प्रवासी संतापले, चिडले. यानंतर विमान कंपनीने प्रवासांची माफी मागितली आहे.
एका निवेदनात, विमान कंपनीने म्हटले आहे की त्यांना विविध कारणांमुळे उड्डाणे रद्द करावी लागली, ज्यात क्रूची कमतरता, तांत्रिक समस्या आणि विमानतळावरील गर्दी यांचा समावेश आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. उड्डाणे रद्द केल्याबद्दल प्रवाशांनी एअरलाइनवर संताप व्यक्त केला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या कॅबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफने अचानक कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिफ्ट वाटप आणि ड्युटी तासांबाबत मॅनेजमेंटसोबत सुरू असलेल्या वादातूनच हे आंदोलन उफाळून आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. आंदोलनामुळे इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स उशिराने सुरू होत आहेत, तर काही फ्लाइट्स रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांची मोठी कोंडी झाली आहे. तिकीट तपासणी काउंटर, सुरक्षा तपासणी विभाग आणि बोर्डिंग गेट परिसरात प्रवाशांनी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेकजण आपापल्या फ्लाइट्स चुकण्याच्या भीतीने अस्वस्थ दिसत आहेत.
प्रवाशांचे म्हणणे आहे की एअरलाईन्सकडून योग्य माहिती मिळत नसल्याने अनिश्चितता वाढत आहे. फ्लाइट उशिराची सूचना सतत बदलत असल्याने नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली असून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, इंडिगो व्यवस्थापनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून चर्चा सकारात्मक दिशेने जात असल्याची माहिती मिळत आहे. तथापि, आंदोलनामुळे विमानतळावरील कार्यव्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले असून सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
